अन्य

कोरोनाविषाणू विषयी असलेल्या ह्या ८ गैरसमजुतींवर विश्वास ठेवणे आणि ते पसरवणे तुम्ही थांबवले पाहिजे!

    In this Article

कोरोनाव्हायरसच्या केसेसची संख्या जगभरात वाढत चालली  आहे. तसेच सर्वांना धक्का बसणारी आणखी एक बाब म्हणजे इंटरनेटवर त्याविषयी फिरत असलेली चुकीची माहिती आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ ही होय. यातून सुटण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कोरोनाविषाणूविषयी खोट्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण बघू:

तुम्ही विश्वास ठेऊ नयेत अशा कोरोनाविषयीच्या खोट्या गोष्टी

आपण घाबरून जाण्यापूर्वी किंवा कोरोनाविषाणूविषयी एखादी माहिती व्हॉटसऍपवर पुढे पाठवण्याच्या आधी किंवा आपले आरोग्य सुरक्षित करण्यासाठी कोरोनाविषाणू विषयीच्या चुकीच्या गोष्टी जाणून घ्या कारण चुकीची माहिती विषाणूइतकीच घातक ठरू शकते!

१. कोरोनाव्हायरस चा सामना करण्यासाठी चेहऱ्यावरचे मास्क १००% प्रभावी आहेत

मास्क लावला की कोरोनाविषाणूंपासून अगदी खात्रीशीर रित्या संरक्षण मिळते हा सामान्य समज आहे. पण ते पूर्णतः खरे नाही. सुरुवातीला, सहज उपलब्ध असलेले पातळ कागदाचे मास्क हे शिंकांद्वारे किंवा खोकल्याद्वारे पसरणाऱ्या बारीक कणांना रोखण्यास प्रभावी नसतात. तसेच आपल्याला मास्क वापरायची सवय नसल्यामुळे आपण आपल्याला अस्वस्थ वाटले की मास्क ऍडजेस्ट करण्यासाठी चेहऱ्याभोवतीच्या भागाला आपण वारंवार स्पर्श करतो.  त्यामुळे केवळ आपले डोळे आणि तोंडाजवळ जंतू जाण्याची शक्यता वाढते. आरोग्यतज्ञ सल्ला देतात की आपण आजारी असल्याशिवाय किंवा आजारी असलेल्याची काळजी घेत असल्याशिवाय आपल्याला फेस मास्क घालण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी काळजीवाहकांसाठी फेस मास्कला प्राधान्य दिले जावे कारण आजकाल मास्क कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.

२. गरम आणि दमट प्रदेशात कोरोनाविषाणूचा प्रसार होत नाही

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, कोविड-१९ उष्ण व दमट हवामान असलेल्या भागातही संक्रमित होऊ शकतो. आपण कोणत्या वातावरणामध्ये राहता हे महत्त्वाचे नसते, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सतत हात धुणे आवश्यक आहे तसेच खोकण्यापूर्वी आणि शिंकण्यापूर्वी तोंड झाकणे यासारख्या पूर्व-उपाययोजना करणे महत्वाचे आहे.

३. गरम पाण्याने आंघोळ केल्याने विषाणूचा नाश होतो

एकदा आपल्या शरीरात विषाणूचा प्रवेश झाल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. गरम पाण्याने अंघोळ केल्याने विषाणू नष्ट होणार नाही, कारण विषाणू आपल्या शरीराच्या पेशींमध्ये खोलवर आहे. आपले शरीर त्याचे तापमान  अत्यंत सावधपणे नियंत्रित करते आणि त्यास जास्त प्रमाणात वाढू देत नाही. पृष्ठभागावरील विषाणूंविरूद्ध लढण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे साबण आणि पाण्याने आपले हात धुणे.

४. कोरोनाविषाणू नष्ट करण्यासाठी हॅन्ड ड्रायर अत्यंत प्रभावी आहेत

नाही. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, हॅन्ड ड्रायर मुळे कोरोनाविषाणू मरत नाहीत. स्वत: ला आणि इतरांना विषाणूंपासून वाचविण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे साबण आणि पाण्याने हातधुणे तसेच  अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझरद्वारे आपले हात स्वच्छ करण्याची कठोर सवय करणे. एकदा स्वच्छ झाल्यावर आपले हात चांगले सुकवा.

५. आपल्या शरीरावर अल्कोहोल किंवा क्लोरीनची फवारणी केल्यामुळे कोरोनाविषाणू मरतो

नाही. स्वत: वर अल्कोहोल किंवा क्लोरीनची फवारणी केल्याने शरीरामध्ये आधीच शिरकाव झालेले विषाणू नष्ट होत नाहीत आणि तसे करण्याचा प्रयत्न करू नका! या पदार्थांची फवारणी करणे आपल्या कपड्यांसाठी किंवा श्लेष्मल त्वचेसाठी (अर्थात तोंड, डोळे) हानिकारक आहे. हे माहित आहे की अल्कोहोल आणि क्लोरीन दोन्ही पृष्ठभागांसाठी जंतुनाशक म्हणून वापरले जाऊ शकते, परंतु ते केवळ शिफारस केल्याप्रमाणेच वापरणे आवश्यक आहे.

६. केवळ वृद्ध लोक कोरोनाविषाणू प्रती अतिसंवेदनशील असतात

कोरोनाविषाणूप्रती विशेषत: वृद्ध लोक अतिसंवेदनशील असतात हे जरी खरे असले तरीसुद्धा, तरुण आणि मध्यमवयीन प्रौढ सुद्धा विषाणूचा संसर्ग होण्यापासून दूर नाहीत. निष्कर्षानुसार, सह्व्याधी असलेल्या वयस्क लोकांना आणि रोगप्रतिकारक प्रणाली कमकुवत असलेल्या लोकांना संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो.

७. पाळीव प्राणी कोरोनाविषाणू मोठ्या प्रमाणात प्रसारित करू शकतात

पाळीव प्राणी कोरोनाविषाणूचा प्रसार करतात ह्या खोट्या अफवेमुळे बरेचसे पाळीव प्राणी कुटुंबापासून दूर ठेवले गेले. डब्ल्यूएचओने याची पुष्टी केली आहे की आपल्या पाळीव प्राण्यांना कोरोनाव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो किंवा त्याचा प्रसार होऊ शकतो असे सूचित करणारा कोणताही पुरावा सध्या येथे नाही. तथापि, पाळीव प्राण्यांच्या संपर्कानंतर आपले हात पूर्णपणे धुण्याची शिफारस केली आहे.

८. ज्यांना कोरोनाविषाणूचा संसर्ग झालेला नाही त्यांच्यासाठी सामाजिक अंतर राखणे आवश्यक नाही

हे खोटे आहे! क्रीडा स्पर्धा, उत्सव आणि सांस्कृतिक उत्सव रद्द करण्याचे कारण म्हणजे कोरोनाविषाणूचा प्रसार कमी होण्याकरिता किंवा थांबवण्यासाठी अशा मोठ्या प्रमाणात लोकांचे एकत्र येणे बंद करणे आवश्यक आहे. जॉन्स हॉपकिन्स मेडिसीन येथे केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की, ‘लोकांमध्ये कमीत कमी सहा फूट अंतर ठेवल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना सहज भेटायला जाण्याआधी दोनदा विचार करा. त्याचप्रमाणे,डॉक्टरांच्या शिफारसीनुसार ज्यांना लक्षणे दिसत आहेत त्यांनी तसेच अति संक्रमित ठिकाणी जाऊन आलेल्या व्यक्तींनी स्वतःचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. सद्य स्थितीत डब्ल्यूएचओने लोकांना कोरोनाविषाणुची माहिती देण्यासाठी संदेशन सेवा सुरू केली आहे. ही सेवा डब्ल्यूएचओला आवश्यकतेनुसार थेट माहिती प्रसारित करण्यास सक्षम करते. मेसेजिंग सेवेद्वारे, कोरोनाव्हायरसवरील नवीनतम बातम्यांसह आणि माहितीसह आपण अपडेटेड राहू शकतो. लक्षणे, सुरक्षित राहण्याचे उपाय, नवीनतम परिस्थिती अहवाल आणि वास्तवीक क्रमांक ह्या बाबतचा तपशील जाणून घेता येईल. संभाषण सक्रिय करण्यासाठी वापरकर्त्यांना ‘हाय’ टाइप करावे लागेल, ज्याद्वारे  त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत करणाऱ्या पर्यायांचे मेनू उघडतील. वैयक्तिक सल्ला देणे बहुतेक वेळेस फायद्याचे असते, तरीही विज्ञानावर लक्ष केंद्रित करणे तितकेच महत्वाचे आहे. जे काही सुचवले जात आहे ते तथ्यांवर आधारित आहे की मिथकांवर हे सुद्धा तपासून पहिले पाहिजे. कोरोनाविषाणू समजून घेण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी जग प्रयन्त करीत आहे अशा वेळेला कोरोनाविषाणूच्या माहितीमध्ये गुंतागुंत होणे शक्य आहे. विज्ञान आणि संशोधनावर आधारित स्वत: ची तयारी करत असताना शांत राहणे ही काळाची गरज आहे. आणखी वाचा: तुमच्या घरातील ज्येष्ठांचे कोरोनाविषाणू पासून कसे संरक्षण कराल? कोविड-१९ कोरोनाविषाणूचा संसर्ग वाढत आहे. तुम्ही (आणि तुमचे कुटुंबीय) कसे सुरक्षित राहू शकाल ह्याविषयी माहिती इथे दिली आहे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved