प्रीस्कूलर (३-५ वर्षे)

दिवाळी 2023: मुलांसाठी दिवाळी ह्या विषयावर निबंध – लिहिण्यासाठी टिप्स आणि नमुने

दिवाळी हा भारतीयांसाठी एक मोठा सण आहे. वाईटावर चांगल्याचा झालेला विजय साजरा करणारा हा एक पारंपरिक हिंदू सण आहे. दिवाळी किंवा दीपावली हा आता एक राष्ट्रीय भारतीय सण बनला आहे. सर्व जाती धर्मांचे लोक हा सण साजरा करतात.

दिवाळी म्हणजे मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी कला सादर करण्याची एक संधी असते. कागदाचे कंदील बनवणे, सुंदर रांगोळ्या काढणे, स्वादिष्ट फराळाचे पदार्थ करणे, किंवा कार्ड आणि शुभेच्छा बनवणे आणि लिहिणे असो, प्रत्येकासाठी काहीतरी आहे, विशेषत: तुमच्या लहान मुलासाठी तर त्यांची कला दाखवण्याची ही खूप छान संधी आहे.

तुमच्या मुलाच्या शाळेत त्याला दिवाळी ह्या विषयवार निबंध लिहिण्यास सांगितले जाऊ शकते. तुम्ही तुमच्या उत्साही लहान मुलासोबत असाल तर तुम्ही दिवाळीविषयी लिहिण्याची ऍक्टिव्हिटी त्याला देऊ शकता. त्यामुळे तो आनंदी आणि व्यस्त राहील. तसेच तो त्याची अमर्याद कल्पनाशक्ती आणि वाढत्या ज्ञानाचा उपयोग करू शकेल.

मुले दिवाळीवर निबंध कसा लिहू शकतात ते पाहूया!

लहान मुलांना दिवाळी ह्या विषयावर निबंध लिहिण्यासाठी महत्वाच्या टिप्स

इथे काही मूलभूत टिप्स दिलेल्या आहेत त्याचा तुमच्या मुलाला निबंध लिहिण्यासाठी उपयोग होऊ शकेल. तुमच्या मुलाला दिवाळी ह्या विषयावर निबंध लिहिण्यासाठी ह्या टिप्सचा उपयोग होईल.

. संशोधन करा

सखोल संशोधन ही उत्तम निबंध लिहिण्याची पहिली पायरी आहे! तुमच्या मुलाला इंटरनेटवर, पुस्तके व मासिकांमध्ये तसेच वैयक्तिक कथा, अनुभवांमधून दिवाळी ह्या विषयावर माहिती गोळा करण्यास सांगा.

. एक रचना तयार करा

निबंध किंवा कथेची सामान्यत: वेगळी सुरुवात, मध्य आणि शेवट असतो . वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर निबंधामध्ये एक सुरुवात, मुख्य भाग आणि निष्कर्ष असणे आवश्यक आहे. परिचय आणि निष्कर्ष हे सहसा प्रत्येकी एक परिच्छेद असतात, तर मुख्य भागामध्ये सुमारे दोन ते तीन परिच्छेद असतात, ज्यामध्ये माहितीच्या विविध मुद्यांचा तपशील असतो.

. निबंधाची सुरुवात चांगली करा

तुमचा निबंध कसा असेल हे सुरुवातीवरून समजते. तुमच्या निबंधाची सुरुवात चांगली असेल तर ती वाचकांना खिळवून ठेवेल आणि वाचकांना संपूर्ण निबंध वाचावासा वाटेल. चांगली सुरुवात करण्यासाठी थोडा वेळ लागला तरी हरकत नाही. तुम्ही चांगली सुरुवात करण्यासाठी त्यामध्ये वैयक्तिक किस्से किंवा ऐतिहासिक तथ्ये सांगू शकता.

. दिवाळी कशी साजरी केली जाते याबद्दल बोला

हा निबंधाचा सर्वात महत्वाचा भाग आहे,हा भाग निबंधाच्या मध्यभागी समाविष्ट केला जाईल. दोन ते तीन परिच्छेदांमध्ये, आपण दिवाळी का साजरी केली जाते, आपल्या देशातील विविध लोक, समुदाय आणि धार्मिक गट हा सण कसा साजरा करतात तसेच दिवाळीचे दिवस, प्रथा आणि विधी काय आहेत आणि त्यांचे काय महत्त्व आहे याबद्दल तुम्ही बोलू शकता.

. पर्यावरणपूरक दिवाळीबद्दल काही मुद्दे लिहा

सणासुदीच्या काळात पर्यावरणाची काळजी हा आता एक प्रमुख मुद्दा आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही सेंद्रिय रांगोळी पावडर, टिकाऊ दिवे, मातीचे दिवे आणि बिनविषारी पेंट वापरण्याबद्दल बोलू शकता. तुम्ही फटाके का लावू नयेत आणि वायू तसेच ध्वनी प्रदूषणाचा पृथ्वीवर होणारा विपरित परिणाम याबद्दलही लिहू शकता.

. वैयक्तिक मुद्दे

तुमचा निबंध चांगला होण्यासाठी तुम्ही त्यामध्ये वैयक्तिक घटना किंवा गोष्टींचा समावेश केल्यास त्याची मदत होते! तुम्ही आणि तुमचे कुटुंब दिवाळी कशी साजरी करता, तुमचे आवडते पदार्थ, तुमच्या चुलत, मावस भावांसोबत भेटणे आणि खेळणे, किंवा सणासुदीच्या काळात घडलेली एखादी मनोरंजक घटना याबद्दल तुम्ही काही ओळी लिहू शकता.

. निबंध छोटा आणि सुटसुटीत ठेवा

दुस-या शब्दात सांगायचे तर, निबंध लिहिताना जास्त गोंधळ घालू नका, कारण तो वाचताना आणि लिहिताना कंटाळवाणा होऊ शकतो! तुमचा निबंध मुद्देसूद,छोटा आणि छान लिहा. वाचकांना आनंद देण्यासाठी अनावश्यक तपशील काढून टाका.

वाचकांसाठी दिवाळीच्या निबंधाचा नमुना

निबंध लिहिण्यासाठी कशी सुरुवात करावी अशा विचारात तुम्ही असाल तर काळजी करू नका. तुम्हाला लिखाणाची प्रेरणा मिळण्यासाठी आम्ही दिवाळीवरील निबंधाचे काही नमुने खाली दिलेले आहेत.

लहान मुलांसाठी दिवाळीवर १० ओळी

मुलांना समजण्यास सोप्या जातील अशा दिवाळीवर काही ओळी इथे देत आहोत

  1. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण
  2. याला दीपावली असेही म्हणतात
  3. हा सण जगभरातील भारतीय आणि श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, फिजी आणि गयाना यांसारख्या देशांतील हिंदू लोक साजरा करतात
  4. पारंपारिकपणे एक हिंदू सण असला तरी, तो आता भारतात सर्व धर्मांच्या लोकांद्वारे राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो
  5. दिवाळी ऐतिहासिकदृष्ट्या वाईटावर चांगल्याच्या विजयाशी संबंधित आहे. श्रीराम रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले होते
  6. या सणाला दिवाळी किंवा दीपावली असे म्हणतात कारण ते प्रभूरामाच्या पुनरागमनासाठी अयोध्येतील लोकांनी लावलेल्या दिव्यांच्या रांगांचे प्रतीक आहे
  7. सणाचा कालावधी पाच दिवसांचा असतो
  8. लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य दिवस आहे, ह्या दिवशी धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते
  9. सध्याच्या काळात, दिवाळी सहसा दिवे लावणे, रांगोळ्या काढणे, घरी पारंपारिक फराळ आणि मिष्टान्न शिजवणे आणि कुटुंबातील सदस्यांसह भेटवस्तू आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करून साजरी केली जाते
  10. हा अनेक कुटुंबांसाठी प्रेम, प्रकाश, आनंद आणि एकत्र येण्याचा कालावधी आहे

दिवाळी वरील परिच्छेद

दिवाळी वरील खाली दिलेला लहान निबंध १५० शब्दांपेक्षा जास्त नाही, आणि इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना दिवाळीसाठीचा निबंध लिहिण्यास प्रेरणा देऊ शकतो

दिवाळी, दिव्यांचा सण, हा भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाणारा सण आहे. हा परंपरेने हिंदू सण आहे, परंतु आज सर्व धर्माचे भारतीय एकत्र येऊन हा लोकप्रिय सण साजरा करतात. ऐतिहासिकदृष्ट्या, रावणाचा पराभव करून प्रभू राम अयोध्येत परत आले तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्याच्या परतीसाठी दिवे लावले. आता अनेक घरांमध्ये दिवे, कंदील आणि पणत्या लावतात. घराची साफसफाई करणे, घरगुती फराळ, मिठाई तयार करणे, रंगीबेरंगी रांगोळ्या काढणे आणि नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे यांचा समावेश होतो. लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य दिवस आहे, ह्या दिवशी कुटुंबे एकत्र येऊन लक्ष्मीची पूजा करतात. त्यानंतर, कुटुंबातील सदस्य भेटवस्तू आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करतात आणि घरी स्वादिष्ट स्वयंपाक करून एकत्र जेवण करतात. अनेक घरांसाठी हा एक अद्भुत काळ आहे, कारण दिवाळी हा सण प्रेम, प्रकाश आणि एकता घेऊन येतो.

दिवाळीवर दीर्घ निबंध

दीर्घ निबंध कसा लिहावा ह्यासाठी खाली काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत -

भारतातील अनेक घरांसाठी, "दिवाळी" म्हणजे पणत्या, पारंपारिक खाद्यपदार्थ आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येणे होय. प्रत्येक दिवाळीला आपण मागील वर्षांकडे वळून पाहतो. खिडक्या आणि बाल्कनीमध्ये तेच दिवे कसे लावले होते, आपण कोणते कपडे घातले होते, कोणती मिठाई तयार केली होती, आवडली होती किंवा नाही आणि हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी आपले मावस, चुलत भावंडे आणि नातेवाईक कसे आले होते ते आठवते.

दिवाळी हा सण भारतातील आणि जगभरातील भारतीयांसाठी आणि श्रीलंका, मलेशिया आणि सिंगापूर सारख्या विविध देशांतील हिंदूंसाठी खूप महत्वाचा आहे. दिवाळी किंवा दीपावली हा शब्द अयोध्येतील लोकांनी दैत्य राजा रावणावर विजय मिळवल्यानंतर प्रभू रामाच्या पुनरागमनाच्या सन्मानार्थ लावलेल्या दिव्यांच्या रांगांमुळे तयार झाला. अशा प्रकारे, दिवाळी हा ऐतिहासिक आणि पारंपारिकदृष्ट्या हिंदू सण आहे. तथापि, बऱ्याच काळापासून, तो भारतातील सर्व धार्मिक गट आणि समुदायांद्वारे साजरा केला जातो. आता हा भारताचा राष्ट्रीय सण आहे.

दिवाळीचा सण एकूण पाच दिवस चालतो. प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. पहिला दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो, ह्या दिवशी कुटुंबातील सदस्य एकत्र घेऊन घर स्वच्छ करतात, जुन्या वस्तू आणि कपडे बाहेर फेकतात किंवा दान करतात आणि नवीन कपडे किंवा दागिन्यांची खरेदी करतात. दुसरा दिवस नरक चतुर्दशी आहे, ह्या दिवशी देवी कालीने नरकासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे. ह्या दिवशी दिवे, पणत्या आणि कंदील लावले जातात आणि रांगोळ्या काढल्या जातात. परंतु, काही घरांमध्ये दिवे नरकचतुर्दशीच्या आधीपासून लावले जातात.

तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन, हा दिवाळीचा मुख्य दिवस आहे. ह्या दिवशी धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पूजेसाठी कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात. चौथा दिवस गोवर्धन पूजन आहे, आणि तो भगवान कृष्णाने आपल्या भक्तांना विनाशकारी पूर आणि पावसापासून वाचवल्याचे सूचित करतो. ह्या पाच दिवसांच्या सणाचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज ह्या दिवशी भाऊ त्यांच्या विवाहित बहिणींना भेट देतात, आणि त्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात व एकत्र जेवण करतात. या दिवसांमध्ये कुटुंब आणि मित्र भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात.

ह्या सणासाठी स्वादिष्ट फराळ केला जातो. ह्या दिवशी लोक लोकप्रिय स्टोअरमधून फराळ विकत घेतात किंवा घरी बनवतात. दिवाळीच्या फराळाच्या थाळीमध्ये विविध प्रकारचे लाडू आणि पेढे, तळलेले स्नॅक्स आणि ड्रायफ्रूट मिक्स असतात. कुटुंबांनी एकत्र जेवण्याची परंपरा आहे आणि त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने एकत्र येता येते आणि आनंद घेता येतो.

आजकाल हा पाच दिवसांचा उत्सव घरोघरी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही कुटुंबे पाचही दिवस हा सण साजरा करतात, तर काही फक्त नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेचे दिवस पाळतात. इतर काही लोक फक्त लक्ष्मीपूजन करतात, परंतु संपूर्ण दिवाळीच्या दिवसांमध्ये पणत्या लावतात. आपला देश खूप वैविध्यपूर्ण आहे, आणि त्यामुळे आपले सण कसे साजरे केले जातात यात फरक नक्कीच आहे.

पर्यावरणपूरक दिवाळीचा सराव हा आणखी एक ट्रेंड आहे. अशी दिवाळी साजरी करताना फटाके फोडले जात नाहीत आणि सेंद्रिय व बिनविषारी रांगोळी रंग आणि पावडरचा वापर केला जातो. कौटुंबिक सदस्य आणि मित्र एकमेकांना कपडे किंवा इतर वस्तूंऐवजी रोपे,आणि बिया भेट देतात.

भारतीय कुटुंबाना दिवाळीचा सण हा खूप प्रिय आहे. आपण त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. कुटुंबातील सगळे जण पणत्या लावणे, मिठाई खाणे, नवीन कपडे खरेदी करणे इत्यादी गोष्टी एकत्र येऊन करतात.चुलत, मावस भावंडांची तसेच नातेवाईकांची ह्या कालावधीत भेट होते.

इको फ्रेंडली दिवाळी किंवा ग्रीन दिवाळी या विषयावर निबंध

खालील लहान निबंध मुलांना दिवाळी आणि पर्यावरण विषयावर निबंध लिहिण्यास मदत करू शकतात. हे शिक्षक आणि नातेवाईक दोघांनाही नक्कीच प्रभावित करेल!

दिवाळी हा भारतीय कुटुंबांसाठी चांगला सण आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन घराची स्वच्छता करतात, दिवे लावतात आणि सर्जनशील रांगोळ्या काढतात. फटाके फोडले जातात, विषारी रंग आणि रांगोळी रंग वापरले जातात आणि त्यामुळे प्लास्टिक कचरा निर्माण होतो. आपल्या देशात आणि जगभरातील पर्यावरणामध्ये बिघाड होत असल्यामुळे आपले सण पर्यावरणपूरक आणि आणि निसर्गाला हानी पोहोचू नये अशा पद्धतीने साजरे करणे हे आपले कर्तव्य आहे.

सर्वप्रथम, आपण फटाके फोडू नयेत कारण ते वातावरणात धूर आणि हानिकारक रसायने सोडतात. जरी ते खूप सुंदर दिसत असले तरी त्यांच्या रसायनांमुळे वायू प्रदूषण होते आणि फटाके फोडण्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. या दोन्हींचा प्राणी, झाडे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि अगदी इमारतींवरही विपरीत परिणाम होतो.

दुसरे म्हणजे, आपण बायोडिग्रेडेबल मातीचे डाय, आणि सेंद्रिय पावडर आणि पेंट्सचा वापर केला पाहिजे, त्यामुळे जमीन आणि पाणी प्रदूषित होणार नाही तसेच माणसे आणि प्राण्यांच्या त्वचेला इजा होणार नाही. भेटवस्तूंसाठी, आपण मिटमैत्रिणी आणि कुटुंबाना वनस्पती आणि बियांची देवाणघेवाण करू शकतो. आनंदी आणि प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी एकमेकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचे पालन करण्यास प्रोत्साहित करू शकतो.

दिवाळीवरील निबंध लिहायला देणे हा मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी चांगला क्रियाकलाप आहे. त्यांची लेखन कौशल्ये, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि एकूणच संज्ञानात्मक क्षमता चांगली होण्यास त्यामुळे मदत होते. एकत्र येऊन ह्या सणाचा आनंद घ्या! दिवाळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा!

आणखी वाचा:

मुलांसाठी दिवाळीची माहिती तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेजेस आणि कोट्स

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved